Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेपरदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या ७६ जणांचा शोध सुरू

परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या ७६ जणांचा शोध सुरू

कल्याण (वार्ताहर) : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा दक्ष झाली असून गेल्या आठ दिवसांत केडीएमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या ७६ प्रवाशांचा आरोग्य विभागामार्फत शोध घेतला जात आहे. या प्रवाशांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना फोनद्वारे दिल्या जात आहेत.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सतर्क झालेल्या प्रशासनाकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी प्रत्येक महापालिकेला पाठवली जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत रशिया, शारजा, ओमान, सिंगापूर, मस्कत, यूएई, सौदी अरेबिया, श्रीलंका, मास्को, साउथ कोरिया, स्वीडन, शिकागो, रशिया या देशातून ७६ नागरिक कल्याण-डोंबिवलीत आले आहेत. नियमानुसार परदेशातून आल्यानंतर या नागरिकांनी किमान ७ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक असताना देखील हे नागरिक राज्याच्या विविध भागात फिरत असल्याने या नागरिकांना विलगीकरणाच्या नियमाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार केंद्र आणि राज्य सरकारने दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वाना आणि झिम्बाबे या देशातून येणाऱ्या नागरिकांना हायरिस्क जाहीर केले आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकाची करोना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबधित महापालिकेच्या मागणीनुसार मागील ८ दिवसांत परदेशातून आलेल्या प्रवाशाची यादी आयसीएमआरकडून पाठविण्यात आली असून या यादीनुसार २८ नोव्हेंबरपासून कल्याण-डोंबिवलीत ७६ प्रवासी विविध देशांतून दाखल झाले आहेत. या प्रवाशांचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू केला असता, हे प्रवासी विलगीकरणाचा नियम मोडून राज्याच्या विविध भागात कामानिमित्त किंवा सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरत असल्याचे आढळून आले आहे. या नागरिकांशी संपर्क करत ते असतील त्या महापालिकेच्या हद्दीत त्यांना कोरोना टेस्ट करून त्याचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र यातील एखादा नागरिक जरी पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या संपर्कातील नागरिकांना त्याची लागण होण्याची आणि त्यामुळे धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांनी सामाजिक भान जपत कोरोना रोखण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -