वर्धा : उधारीचे २ हजार रुपये देत नसल्याने शंभू देवराव सोनगडे याचा कारने चिरडून खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी शैलेश येळणे याला ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवार ३ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नालवाडी परिसरातील नागसेननगर येथे घडली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंभू सोनगडे यांची पत्नी जयमाला हिने पल्लवी कोमनकर नावाच्या महिलेकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. ५ हजार रुपयांची वसुली करण्याकरिता शैलेश, पल्लवी कोमनकर व त्याचा एक सहकारी शंभू सोनगडे यांच्या घरी आला होता. दरम्यान, जयमालाने ३ हजार रुपये देऊन २ हजार रुपये काही दिवसांनी देईल असे सांगताच त्यांच्यात वाद होऊन घरातच हाणामारी सुरू झाली.
त्यानंतर शैलेश येळणे याने घराबाहेर येऊन स्वत:ची कार सुरू केली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या शंभूच्या अंगावर चढवली. यात शंभू गंभीर जखमी झाल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक उपासे, जमादार राजेंद्र कापसे करीत आहे.