मुंबई: अवकाळी पावसामुळे मच्छिमा-यांच्या नौका किना-याला विसावल्या आहेत. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होड्या समुद्रात सोडवण्यात मनाई करण्यात आलीय. त्यामुळे मासे खाणा-या खवय्यांसाठी शुक्रवार आणि रविवारसह पुढील चार दिवस सुकेच जाणार आहे.
एरव्ही मासे खाणारे खवय्ये शुक्रवार आणि रविवारची आतुरतेने वाट पाहतात. रविवार तर सुट्टीचा असल्यामुळे यादिवशी खास नॉनव्हेजचे बेत आखले जातात. पण आता अवकाळी पावसामुळे हा रविवार सुकाचं जाणार आहे.
अवकाळी पावसाचा फटका जसा भाज्या आणि फळभाज्यांवर दिसून आला तसा तो आता मच्छिव्यवसायावरही दिसून येत आहे. राज्यात गेले दोन दिवस धोधो पडणारा पाऊस आणि गार वारे यामुळे होड्या समुद्रात सोडण्यात आलेल्या नाही. अनेक नौका आणि होड्या किना-यावर लागल्याने मच्छिमारदेखील हवालदिल झाले आहेत. मच्छिव्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच कोरोनाने मच्छिमा-यांचं कंबरडं मोडलं होतं आणि आता त्यांना अवकाळी पावसाचादेखील सामना करावा लागत आहे.