मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने सरकारसह खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे असतानाही कोरोनाच्या २० महिन्यांनंतर मुंबईसह राज्यात ऑक्सिजनचे अनेक प्लांट अपूर्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
दरम्यान राज्यात ५५१ पीएसए (प्रेशर स्विंग एड्सोर्पक्शन) हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट नियोजित होते. नियोजित पीएसए प्लांटमधून ६५७.१६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार होता. मात्र राज्यात आतापर्यंत केवळ २६८ पीएसए प्लांटस पूर्ण झाले असून त्याची एकूण क्षमता २७५.७६ मेट्रिक टन इतकीच आहे. नियोजित पीएसए प्लांटच्या निम्मे प्लांट देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत. तर मुंबईमध्ये देखील १७ पीएसए प्लांट नियोजित होते. त्यातून ७७.७७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार होता असे असताना केवळ मुंबईने ८ पीएसए प्लांट पूर्ण केले आहेत. त्यातून केवळ १९.७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास पुन्हा रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.