
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १ डिसेंबरपासून १ पहिलीपासून शाळा सुरु करण्याचे ठरविले होते. मात्र ओमायक्रॉन विषाणूने पुन्हा एकदा सर्वाना चिंतेत पाडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय घेऊन मुलांच्या आरोग्याशी खेळू नये असे पालकवर्गांचे म्हणणे आहे. शिक्षण स्वाभिमानी संघटनेने सरकारच्या या निर्णयाला ठाम विरोध केला आहे. या निर्णयाबाबत सरकारने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने द्यावी अशी मागणी पालकांनी पत्रकारांशी बोलताना केली. याबाबत संघटनेने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना लेखी पत्र दिले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील आधार इंडिया कार्यालयात शिक्षण स्वाभिमानी संघटनेने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, सल्लागार डॉ.अमित दुखंडे यांसह अनेक पालक उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष गायकवाड यांनी पालकांची बाजू मांडताना राज्य सरकारने विद्यार्थ्यांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. तर डॉ. दुखंडे म्हणाले, यांनी लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याशिवाय शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये.
तर यावेळी पद्मजा तेजव म्हणाल्या, गेली दीड वर्ष ऑनलाईन पद्धतीने शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यत राज्य सरकारने ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देण्याबाबतचा निर्णय घेऊ नये अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष गायकवाड हे पुढे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात अनेक पालक संघटना आहेत. या सर्व पालक संघटनेशी आमची चर्चा सुरु आहे. डोंबिवलीतील जवळपास ८० टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांना विचारात घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.