
नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या १२ खासदारांचे संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
निलंबित खासदारांमध्ये सर्वाधिक म्हणजेच अर्धे खासदार हे काँग्रसचे आहेत. त्याचप्रमाणे तृणमूल आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि सीपीएम, सीपीआयचे प्रत्येकी एक, असे एकूण १२ खासदार निलंबित करण्यात आले आहेत.
राज्यसभेच्या २५४व्या अधिवेशनामध्ये म्हणजेच ११ ऑगस्ट २०२१च्या दिवशी झालेल्या मान्सून सत्राच्या वेळेस या सर्व खासदारांनी सभागृहाची प्रतिमा मलिन होईल अशी वर्तवणूक केली. त्यामुळेच राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणूकीसंदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
निलंबित खासदार व पक्ष
फुलो देव निताम (काँग्रेस) छाया वर्मा (काँग्रेस) रिपून बोरा (काँग्रेस) अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) राजमणी पटेल (काँग्रेस) सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस) डोला सेन (तृणमूल काँग्रेस) शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस) प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना) अनिल देसाई (शिवसेना) बिनोय विश्मव (सीपीआय) एल्लामारम करीम (सीपीएम)