कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमध्ये बेकायदेशीर बालक आश्रमातून ७१ बालकांची सुटका करण्यात आली असून त्यांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बेकायदेशीरपणे बालक आश्रम सुरू करून लहान मुलांना निष्काळजीपणे बेकायदेशीरपणे ठेवल्याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एका दाम्पत्याने पोटच्या पाच दिवसांच्या बाळाला एक लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीसारख्या सुशिक्षित नगरीत घडला होता. दोन दिवसांनंतर त्या आईने बाळ परत मागितले, मात्र त्या डॉक्टरने देण्यास नकार दिल्याने हा प्रकार उजेडात आला.
या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर केतन सोनीसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासादरम्यान हा डॉक्टर बेकायदेशीरपणे हा आश्रम चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने या बालक आश्रममधून छापा टाकत ७१ बालकांची सुटका करण्यात आली असून मुलं दत्तक देताना आणि घेताना कायदेशीर मार्गाने घ्यावीत, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने केले आहे.
या प्रकरणी महिला व बाल विकास समितीच्या बालसंरक्षण विभागाला माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासादरम्यान आणखी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संस्थेची तपासणी केल्यानंतर लहान-मोठ्या मुलींचे कपडे वाळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी मुली संस्थेत राहत नाहीत, असे उत्तर दिले. बालकल्याण समितीला संशय आल्याने त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संस्थेच्या खोल्यांची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर ३८ मुले-मुली ही २ ते १३ वयोगटातील बालके एका खोलीत कोंडून ठेवल्याचे आढळून आले.