उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत
कोरोनाने सर्वच अर्थकारण ढवळून निघाले आहे. आपण सारेच भारतीय उत्सवप्रिय आहोत. देशात एकावन्न मोठे सण साजरे केले जातात, त्यातील सतरा सण पूर्ण भारतभर साजरे केले जातात. संस्कृतीचे प्रतिबिंब सण साजरे करण्याच्या वृत्तीत दिसते. बाजारात तेजी असो वा मंदी आपण प्रत्येक सण धुमधडाक्यात साजरे करतो. जिथे बहुसंख्य लोक कुणावर तरी श्रद्धा ठेवतात आणि परंपरेचे पालन करतानाच त्याचा नवा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आपली हौस भागावण्याची कृती करताना फारसा खोलवर विचार केला जात नाही. याच काळात अनेक किरकोळ दुकानदारही खरेदीस प्रोत्साहन म्हणून बिलात सूट किंवा मोफत भेटवस्तू देतात. कोरोनापूर्व काळात आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न घटत असतानाही सर्वाधिक आर्थिक उलाढाल याच उत्सव काळात झाली.
शेअरबाजाराने याच काळात नीचांक गाठून लगेचच सर्वोच्च टप्पा गाठला. भारतात घट्ट पाय रोवलेली अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट, स्नॅपडील, रिलायन्स रिटेल्स, बिग बाजार वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येतात. अनेक जण येणाऱ्या नव्या ऑफर्सची वाट पाहत असतात. त्यासाठी प्रसंगी आपली खरेदी ते लांबणीवर टाकतात. या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा होतो, त्याची क्रयशक्ती वाढते, राहणीमान उंचावते. संपत्तीचे असमान वितरण असल्याने वस्तूंना स्वस्त पर्याय उपलब्ध होतात.
सन २०११च्या जनगणनेनुसार देशात २.१ दशलक्ष मंदिरे आहेत. त्यात अर्पण केलेल्या दानाद्वारे प्रचंड संपत्तीची उलाढाल होते. त्याच्याशी संबंधित अनेक पूरक व्यवसाय त्याच्या आजूबाजूला उदयास येतात. मंदिरे आणि उत्सव अर्थव्यवस्था उचवण्यात बहुमोल कामगिरी करतात. पहिल्या लॉकडाऊनला बंद करण्यात आलेली मंदिरे दुसरी लाट गेल्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी उघडण्यात आली आहेत. अनेक गोष्टी हळूहळू खुल्या झाल्यावर, पुन्हा अशा लाटा येणारच नाहीत किंवा एकामागून एक येत राहतील याबाबत कुणीही निश्चितपणे काहीच सांगू शकत नाही. दहीहंडी, गणपती हे सण आपण निर्बंधाखाली साजरे केले गेले. दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या आरोग्यव्यवस्थेच्या मागील अनुभवावरून सरकार योग्य त्या उपाययोजना करीलच. महाराष्ट्रातील गणपती उत्सवातील दहा दिवसांत २०००० कोटी रुपयांची उलाढाल होते. यात वार्षिक १०% वाढ झाली असावी. बंगालमधील दुर्गापूजा महोत्सवात ४०००० कोटी रुपयांची उलाढाल होत असून त्यात वार्षिक ३५% वाढ झाली असावी. रोज ५० ते ६० कोटी रुपयांची खाद्यपदार्थ विक्री या काळात होते. यामुळे असंघटित, अकुशल क्षेत्रात रोजगार निर्मिती होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ४०० कोटींची उलाढाल होऊन ४००० कुटुंबांना रोजगार मिळाला आणि उत्तरायणच्या निमित्ताने ५०० कोटींची उलाढाल होऊन ६००० कुटुंबांना रोजगार मिळू शकतो. या सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. देशभरात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या सणात इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, वाहने, फटाके याची खरेदी होते. वर्षभराच्या खरेदीत बराच हिस्सा दिवाळीत वापरला जातो. फटाके खरेदीत थोडी घट झाली असली तरी अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. सन २०२०च्या ७२००० कोटी रुपयांच्या तुलनेत या दिवाळीत १,२५००० कोटी रुपयांची खरेदी झाली. प्राधान्यक्रम बदलून विक्री वाढत असल्याने अनेक देश आपल्याकडे त्याच्या नवनवीन उत्पादनांचे संभाव्य खरेदीदार म्हणून पाहत असतात.
उत्सवातील चिनी मालाचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे. सर्वच क्षेत्रात चीनने स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध करून दिल्याने अनेक रोजगार नष्ट झाले आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रयत्न सरकारी आणि खासगी पातळीवर चालू आहेत. मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ‘Value for Money’ असे पर्याय उपलब्ध नाहीत; त्यामुळे या वस्तूंवर पूर्णपणे त्यांचा प्रभाव आहे. देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यांनी काही सण नवीन निर्माण केले आहेत. पूर्वी क्वचितच साजरे केले जाणारे वाढदिवस आता नियमित साजरे केले जातातच. शिवाय ५०, ६०, ७५ वर्षांचे वाढदिवस. लग्नाचा २५, ५०, ६०वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात असल्याने त्याचे रूपांतर उत्सवात झाले आहे.
३१ डिसेंबरला रात्री नव्या वर्षाचे स्वागत, १४ फेब्रुवारीस येणारा व्हॅलेन्टाइन डे त्याच्या मागेपुढे साजरा केला जाणारा विविध दिवसांचा सप्ताह, मदर्स डे, फादर्स डे अशा विविध दिवसांची त्यात भर पडली असून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने खरेदी करणे, पर्यटनास जाणे बाजारात नव्याने आलेल्या वस्तू आपल्याकडे हव्यातच, अशी उपभोगाची मानसिकता या नवतरुण ग्राहकांची आहे.
मधल्या कोरोनाच्या कालखंडात ठप्प झालेल्या अर्थचक्रास आता गती मिळत आहे, ही यातील जमेची बाजू असली, तरी तमाम ग्राहकांना आवाहन की, पर्यावरणस्नेही वस्तूंची खरेदी करा. शक्यतोवर देशी उत्पादने विकत घेऊन आपल्याच लोकांचा फायदा करून द्या. ऑनलाइन खरेदी करताना पुरेशी दक्षता घ्या.
[email protected]