ठाणे (वार्ताहर) : भारत सरकारच्या वतीने २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्रमांकावर, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्रमांक राखण्यात शहराला यश आले आहे.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन २०२१ रोजी कचऱ्याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृद्धी आणि निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते.
या सर्वेक्षणामध्ये सन २०२०ला ठाणे शहराने ५७व्या क्रमांकावरून देशात १४व्या क्रमांकावर आघाडी घेतली होती, तर सन २०२१ला हाच क्रमांक राखण्यात यश आले आहे, तर राज्यात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदन केले आहे.
महापालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन
कचरामुक्त शहर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या देशभरातील महापालिकांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये ठाणे महापालिकेला ‘थ्री स्टार’ मानांकन जाहीर झाले आहे. यानिमित्ताने आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने कचरा व्यवस्थापनात केलेल्या कार्यावर सन्मानाची मोहर उमटली आहे. शनिवारी केंद्रीय नगरविकास आणि शहर कामकाज विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांच्या हस्ते हा सन्मान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांनी नवी दिल्ली येथे स्वीकारला.
ठाणे शहरातील सोसायट्यांमध्ये कचऱ्याबाबत जनजागृती, ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण, कचरा वेचकांची नियुक्ती, ई-वेस्टचे योग्य नियोजन, निर्माल्यापासून खतनिर्मिती, हिरव्या कचऱ्यापासून ब्रिकेट तयार करणे, कचराकुंडी मुक्त शहर, आदी पर्यावरणपुरक योजनांमुळे ठाणे महापालिका ‘थ्री स्टार’ मानांकनापर्यंत पोहोचली आहे.
भारत सरकारने देशभरातील महापालिकांचे विविध निकषांवर सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये ठाणे महापालिकेने बाजी मारली आहे. घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठाणे महापालिका करीत असल्याने विविध उपाययोजनांमुळे ठाणे महापालिका हे सर्व निकष पुर्ण केले आहेत.