चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या भागात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कूळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या वादामुळे परशुराम घाटातील काम स्थगित ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नाही.
जमीन मालक, खोत व कुळांनी आपापसात तोडगा काढावा. पावसाळ्यानंतर काम सुरू करू, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. तसेच कूळ ८० टक्के, खोत १० टक्के व देवस्थान १० टक्के अशा पद्धतीने मोबदल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून कूळ व देवस्थानसाठी ९०-१० चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या दोन्ही प्रस्तावांवर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पेढे व परशुरामच्या ग्रामस्थांनी पुन्हा चौपदरीकरणास तीव्र विरोध केला. त्यानंतर आजतागायत परशुराम घाटातील कामाला सुरुवात झालेली नाही. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, पावसामुळे हा भाग आणखीन ठिसूळ होऊन कोसळण्याचा धोका वाढला आहे.
घरांना धोका
पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पायथ्यालगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच सहा घरांना फटका बसला. अजूनही हा धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूला मोठी वस्ती आहे. या घरांसाठी दिवसेंदिवस धोका वाढत आहे. त्यामुळे याप्रश्नी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस निर्णय देण्याची मागणी केली जात आहे.
केवळ ५ मिनिटांत स्थगिती
विशेष म्हणजे हा भाग महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. गेल्या तीन वर्षांपासून मोबदल्याच्या वादावरून चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. निवडणुकीपूर्वी एकदा पोलीस फौजफाट्यात काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने कामास ५ मिनिटांत स्थगिती मिळाली.