Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

रुग्णांची संख्या हजारांखाली; कोरोना मृत्यूही घटले

रुग्णांची संख्या हजारांखाली; कोरोना मृत्यूही घटले

मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात राज्यात ९०६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ही संख्या ९६३ इतकी होती. मंगळवारी दिवसभरात ९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गुरुवारी हीच संख्या ९७२ इतकी होती. शुक्रवारी १५ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी २४ जणांनी प्राण गमावला.


राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून मृत्यूसंख्या कमी झाली आहे. निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. काल राज्यात झालेल्या १५ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ७२ हजार ६८१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के इतके आहे.


मुंबई मनपा क्षेत्रात सर्वाधिक रुग्णवाढ


राज्यातील कालची एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ११,७०४ इतकी आहे. गुरुवारी ही संख्या ११,७३२ इतकी होती. याबरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता काल सर्वात जास्त रुग्णवाढ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण २३१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे, तर त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात ८५ नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात ७६ नवे रुग्ण आढळले असून पुणे मनपा क्षेत्रात ७६ रुग्ण आढळले आहेत.


त्या खालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण २८, तर ठाणे जिल्ह्यात १६ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३०, कल्याण, डोंबिवली मनपा क्षेत्रात २३, मीरा, भाईंदर मनपा क्षेत्रात १५, पनवेल मनपा क्षेत्रात १६, वसई, विरार मनपा क्षेत्रात २४ आणि रायगडमध्ये ही संख्या १० इतकी आहे.


तसेच, नाशिक मनपा क्षेत्रात २६, नाशिक जिल्ह्यात ३०, सोलापूर जिल्ह्यात १९, साताऱ्यात ही संख्या २२, कोल्हापूर जिल्ह्यात १, कोल्हापूर मनपात ४, सांगलीत ९, रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात ३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment