नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) : सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित वार्षिक शिखर परिषदेला गुरुवारी ऑस्ट्रेलियामध्ये प्रारंभ झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यात ‘देशातील डिजिटल क्रांती आणि डिजिटल तंत्रज्ञानातील आव्हाने’ या विषयावर त्यांनी भाष्य केले. ‘क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनांबाबत सर्व देशांनी एकत्र यायला हवे आणि परस्पर सहकार्य केले पाहिजे. या गोष्टींचा गैरवापर होणार नाही व या आभासी चलनामुळे युवा पिढी बिघडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे’, असे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. ‘डिजिटल क्रांतीमुळे आपण एक मोठे स्थित्यंतर अनुभवत आहोत. त्यामुळे राजकारण, अर्थव्यवस्था, समाज यांची पुनर्मांडणी होत आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे सार्वभौमत्व, शासन, नैतिकता, कायदा, हक्क, सुरक्षा यावर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत’, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित ‘सिडनी डायलॉग’ ही तीनदिवसीय शिखर परिषद आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आभासी उपस्थितीने आणि भाषणाने परिषदेला सुरुवात झाली. भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल, सुरू असलेल्या बदलांबाबत तसेच सायबर तंत्रज्ञाशी संबंधित आव्हानांबाबत मोदी यांनी यावेळी माहिती दिली. भारतातील डिजिटल क्रांतीचा आणि त्यामुळे होत असलेल्या ५ प्रमुख बदलांचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला. ‘देशात आम्ही ६ लाख गावे ही फायबर केबलने जोडत आहोत. आरोग्य सेतू आणि कोविन अॅप यांचा वापर करत आम्ही ११० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा शासन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात करत आहोत. आरोग्यापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत तसेच उद्योग आणि सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल हे डिजिटल क्रांतीमुळे होत आहेत व केले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, भविष्यातील दूरसंचार क्षेत्र जसे की ‘५जी’ आणि ‘६जी’ या सर्वांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या भाषणात दिली.