भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उड्डाणपुलावर सुरू असलेल्या कामाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
भिवंडी महानगरपालिका हद्दीतील दिवंगत राजीव गांधी उड्डाणपूलाची मागील एक महिन्यांपासून दुरुस्ती सुरू आहे; परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल दुरुस्त करीत असताना यामध्ये वापरण्यात येणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असल्याने या उड्डाणपुलावर होणारा खर्च व्यर्थ असल्याने कोट्यवधी रुपये खर्च हा वाया जाणार असल्याने उड्डाणपुलाचे काम बंद पाडले आहे.
या उड्डाणपुलावर जवळपास ६ कोटीहून अधिक खर्च हा दुरुस्तीसाठी होत आहे; परंतु कामही निकृष्ट दर्जाचे असल्याने यावर होणार खर्च हा व्यर्थ जाणार असल्याने ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे काम करावे यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून समज दिली आहे. पुढचे आंदोलन हे मनसे स्टाईलने असेल असे मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी सांगितले.
या आंदोलनात मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी, भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, उपशहराध्यक्ष प्रवीण दिवेकर, विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष परेश चौधरी व अन्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.