Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमीरझा अकादमीच्या दंगलखोर नेत्यांना अटक करा: आमदार नितेश राणे

रझा अकादमीच्या दंगलखोर नेत्यांना अटक करा: आमदार नितेश राणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी तसेच १२ नोव्हेंबरच्या मोर्चाच्या वेळी झालेल्या दंगलीच्या संदर्भात जबाबदार असलेल्या रझा अकादमीच्या नेत्यांसह सर्व इतर नेत्यांना अटक करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

यापुढे हिंदूंवर कोठेही अत्याचार झाला, तर त्यानंतर होणाऱ्या भूकंपाला राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असेल. आमच्या अधिकारासाठी हिंदू म्हणून कोणत्याही टोकाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल, असेही नितेश राणे म्हणाले. रझा अकादमीचा मोर्चा व विध्वंसाच्या तयारीबाबतचे सर्व पुरावे राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडे देणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र देऊन एनआयएकडून या साऱ्या घटनांचा तपास करण्याची विनंती करणार आहोत, असेही ते म्हणाले.

१३ नोव्हेंबरला अमरावतीत झालेल्या हिंसाचाराला भाजप, विश्व हिंदू परिषद, आरएसएस जबाबदार असल्याचे भासवून भाजपचे नेते अनिल बोंडे यांना अटक केली जात आहे. पण, खरे तर जी घटना घडलीच नाही त्यावर १२ नोव्हेंबरला मोर्चा काढायला रझा अकादमीला राज्य सरकारने परवानगी का दिली, असा सवाल राणे यांनी विचारला.

एकतरी फोटो दाखवा

त्रिपुरामध्ये हिंदूंनी मशीद तोडली म्हणून रझा अकादमीने येथे मोर्चा काढला. पण, प्रत्यक्षात तेथे एकही मशीद तोडली गेली नाही.

गल्ली-गल्लीत जाऊन मुसलमानांची माथी भडकवणाऱ्या रझा अकादमीने त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचा एकतरी फोटो दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले. याउलट रझा अकादमीने मोर्चाची पत्रके वाटली. त्यावर जुम्माच्या नमाजनंतर देगलूर नाक्यावर जमण्याचे आवाहन केले होते. त्रिपुरातल्या मुसलमानांना वाचवा, असे त्यात नमूद करण्यात आले होते, असे ते म्हणाले.

रझा अकादमी अतिरेकी संघटना

रझा अकादमी ही कट्टरपंथी अतिरेकी संघटना आहे. तिच्यावर ताबडतोब बंदी घातली पाहिजे. या संघटनेचा संस्थापक अफगाणिस्तानात राहतो. तेथे तालिबानी राजवट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुसलमान महिलांना अधिकार देणारा ट्रिपल तलाकचा कायदा केला, तेव्हा यांनीच विरोध केला होता. फ्रान्सच्या अध्यक्षांच्या लोकशाहीच्या भूमिकेला यांनीच विरोध केला होता. चित्रपटगृहे सुरू करण्याच्या सौदी अरेबियाच्या निर्णयाला यांनीच विरोध केला होता. १२ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईत आझाद मैदानावर महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग करणारा मोर्चा याच रझा अकादमीने काढला होता. जगताप आणि गांगुर्डे या पोलिसांची हत्याा रझा अकादमीच्या भिवंडीत काढलेल्या २०१० मधील मोर्चानंतरच झाली. १९८७ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तीव्र विरोध करणारी हीच अकादमी होती आणि आज शिवसेनेचेच संजय राऊत, अर्जुन खोतकर त्यांचे समर्थन करत आहेत, असेही ते म्हणाले.

हे काय तेथे सत्यनारायण घालत होते?

१३ नोव्हेंबरला मोर्चा काढला म्हणून अनिल बोंडे यांच्यावर कारवाई करणाऱ्या राज्य सरकारने १२ नोव्हेंबरला मोर्चा काढून तमाशा घालणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या, दंगा करणाऱ्या रझा अकादमीच्या नेत्यांना का अटक केली नाही? ते काय सत्यनारायण घालत होते का, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

हा पूर्वनियोजित कट

रझा अकादमीने काढलेला मोर्चा हा पूर्वनियोजित कट होता. समाजमाध्यमांचा यासाठी पुरेपूर वापर केला गेला. ट्विटरवरून खोटे फोटो टाकून त्रिपुरामध्ये मशीद तोडली गेल्याची अफवा पसरवण्यात आली. काही जणांनी तसे ट्विट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -