नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व रेल्वे गाड्या आता पूर्वीप्रमाणेच धावणार आहेत. म्हणजेच या गाड्या जुने क्रमांक आणि जुन्या तिकीटदरानुसार धावतील. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी हा निर्णय घेतला. कोरोना काळात या गाड्यांना दिलेल्या विशेष दर्जामुळे प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत होते.
रेल्वे बोर्डाने शुक्रवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रेल्वे नियमित क्रमांकासह आणि प्रवासाच्या संबंधित वर्ग आणि ट्रेनच्या प्रकारासाठी लागू असलेल्या भाड्यांसह पूर्ववत चालवल्या जातील. या निर्णयामुळे सध्याचे भाडे ३० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी, १७०० रेल्वे गाड्या मेल किंवा एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालवण्यात येत होत्या, त्या लॉकडाऊन दरम्यान थांबवण्यात आल्या होत्या.
हळूहळू सर्व अनलॉक होत असताना रेल्वे मंत्रालयाने मर्यादित रेल्वे पुन्हा सुरू केल्या आणि त्यांना ‘विशेष’ दर्जा दिला होता. शिवाय, ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली होती. रेल्वेशी संबंधित सर्व सॉफ्टवेअरमध्ये नवीन अपडेट टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे याला दोन-तीन दिवसांचा कालावधील लागू शकतो, असे केंद्रीय रेल्वे माहिती कार्यालयाने सांगितले.
तथापि, आधीपासून बुक करून ठेवलेल्या तिकिटांना नवीन नियमातील तिकीटदर लागू होणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.