Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीरझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा...

रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…

आमदार नितेश राणे यांचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरामधील कथित घटनेच्या विरोधात रझा अकादमीने शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आघाडी सरकारने रझा अकादमीवर लवकरात लवकर बंदी घालावी. अन्यथा त्यांना कसे संपवायचे ते आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये बघू, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

ज्या पद्धतीने रझा अकादमीने ही दंगल घडवली आहेत, त्याची माहिती आमच्याकडे आहे, असे सांगून नितेश राणे म्हणाले, शुक्रवारी एका वेगळ्या उद्देशाने मोर्चा काढला गेला. हिंदूंना दबावात आणण्यासाठी हा मोर्चा होता.

महाराष्ट्रात जी दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमीच आहे. सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा त्यांनी दिला.

रझा अकादमीला भाजपाचे पिल्लू म्हणणारे संजय राऊत यांचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, संजय राऊत आणि शिवसेनेने आपला आत्मा सत्तेसाठी विकला आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या भाषणाची सीडी पाठवणार आहे. ती भाषणे ऐकल्यावर संजय राऊतांना कळेल की, सेनेची ओरिजनल भूमिका काय होती! तसेच ही रझा अकादमी हे महाविकास आघाडीचेच चौथे पिल्लू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

…तर अशा घटना होतच राहतील – निलेश राणे

त्रिपुरामध्ये घटना घडलीच नाही तरी, हिंदू समाजाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्रात मोर्चे काढले गेले. रझा अकादमीच्या लोकांना आत्ताच ठेचले नाही तर अशा घटना नेहमी होत राहतील. याच रझा अकादमीने आझाद मैदानात देखील मोर्चा काढला होता आणि अनेक पोलीस बांधवांवर हात उचलले होते, असे भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -