Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

राज्यात येतेय गुलाबी थंडी; तर काही ठिकाणी सरी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ऑक्टोबर हिटचा उकाडा कमी होत चालला असून हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह वाढल्यामुळे राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे. पण सध्या राज्यात निसर्गाची वेगळीच करामत पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारवा, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


दक्षिण भारतात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राज्यात शुक्रवार ते रविवार या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बरसलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर आता काही ठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.


शहराचा पारा चांगलाच घसरला आहे. थंडीची चाहूल लागल्याने शहरात गरम कपडे विक्रेत्यांचेही आगमन झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.


पुढील आठवड्यात कमाल तापमानात घसरण होण्यासह थंडीचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सकाळच्या सुमाराला काही भागांमध्ये धुकेही दाटत आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्याची उपासना करणाऱ्या नागरिकांमध्येही उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक जण व्यायामावर भर देत असल्याचे चित्र आहे.


हवामान विभागाने शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, तर शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातुरात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment