अनिकेत देशमुख
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदरजवळील वरसावे नाका येथील जुन्या खाडी पूलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्सोवा पुलावर दुरुस्तीचे काम करायचे असल्याने १३ ते १५ नोव्हेंबर असे तीन दिवस वर्सोवा पुलावरून जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून यादरम्यान वाहतूक नियमनाचे नियोजन करण्यात आले आहे.
वर्सोवा पुलावरील वाहतूक बंद असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिक, पर्यटकांनी या भागातील प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
पुलावरून जाण्याकरिता वाहनांना एकच लेन शिल्लक असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. जुन्या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने गुजरातच्या दिशेने जात असतात. यामुळे अवजड वाहनांना वरसावे पुलावरून मार्गस्थ होऊ न देता दुसऱ्या पर्यायी मार्गाने मार्गस्थ केल्यास बहुतांश वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल.
दहिसर – सुरत मार्गावरील पहिली मार्गिका ३ दिवस बंद असल्याने लगतच्या दुसऱ्या मार्गिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जुन्या पुलावरून काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाणे शहर हद्दीतून वरसावे मार्गे पालघरकडे येणारी वाहने पर्यायी मार्ग म्हणून मुंब्रा खरेगाव टोल नाका मानकोली अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.