मोनिश गायकवाड
भिवंडी : भिवंडी फेणेपाडा मनपा शाळेजवळील दिवंगत पैलवान बाळू ठाकूर चाळीतील रहिवाशांना गेले अनेक महिने पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी सकाळी उठून दूर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.
भिवंडी महानगरपालिका हद्दीतील फेणेपाडा या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील महिलांना अनेक ठिकाणी जाऊन जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पाणी आणावे लागत आहे. पिण्यासाठी दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. महानगर पालिका हद्दीतील या भागातील रहिवाशांकडून महानगरपालिका कर आकारणी करते; परंतु त्यांना आजही ज्या मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, त्यापासून हे आजही वंचित राहिले आहेत. पैलवान बाळू ठाकरे चाळीतील व परिसरातील रहिवासी हे गरीब असल्याने त्यांना या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने या नागरिकांनी अनेक अर्ज व निवेदने महानगरपालिकेच्या विविध विभागात व आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांना देऊनदेखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
दरम्यान पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर महानगरपालिकेवर मोर्चा काढणार, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.