मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच पुन्हा फेरीवाल्यांनी स्थानकाला वेढा घातला आहे. मात्र यामुळे स्थानिकांची आणि प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. यासाठी भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला.
सध्या वांद्रे परिसरात रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र याच वेळी फेरीवाल्यांकडून पुन्हा एकदा स्थानकाला वेढा घालण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. हे लक्षात येताच भाजप आमदार आशीष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली असून याबाबत लवकरच पालिका, अधिकृत फेरीवाले, रिक्षा आणि रेल्वे याची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदार अॅड. आशीष शेलार यांनी पाठपुरावा सुरु केला होता. रेल्वे, पालिका जागेच्या हद्दीचे वाद, फेरीवाल्यांनी घातलेला वेढा, त्यामुळे अपुरी जागा, त्याच ठिकाणी असलेला बस स्टॉप, रिक्षा स्टँड या सर्व विषयांवर मार्ग काढत या सुशोभीकरणाचा प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यांनतर अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई देखील करण्यात आली होती. त्यातून मार्ग काढून २०१९ ला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली; मात्र कोरोना काळात पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण सुरु केले असून रिक्षा आणि बस यामुळे स्थानकातून बाहेर पडणे पुन्हा त्रासदायक होऊ लागले. त्यातच रेल्वे आपल्या हद्दीत पादचारी पुलाचे काम करत असून त्या कामातील भंगाराचे गोडाऊन याच परिसरात बांधण्यात आले आहे. तर एकच मार्ग स्थानकात जाण्यास उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने शेलार यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त मसुरकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.