मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील नऊ प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र याबाबत अद्यापही आदेश प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तसेच निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. यामुळे पुन्हा सर्व आखणी नव्याने करावी लागणार असल्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बुधवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबईतील महानगर पालिकेचे नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ वर जाणार आहे. यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्यापही राज्य सरकारकडून अध्यादेश प्रसिध्द केलेला नाही. अध्यादेश प्रसिद्ध झाल्याशिवाय इतर निर्णय घेता येणार नाही.
तसेच अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबईतील प्रभागांची रचना, आखणी कशी करायची? याबाबतच्या सूचना निवडणूक आयोग करणार आहे. त्यानंतर पालिका प्रत्यक्ष कामाला लागेल. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.