आता चळवळ ‘खरेदीस नकार’ देण्याची

वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत


या वर्षीच्या सगळ्या सणांना एक वेगळे महत्त्व आणि जागतिक महामारीचा संदर्भ आहे. देशोदेशी साजरे होणारे सगळे सण गेल्या वर्षी कुलुपबंद करून ठेवावे लागले होते. त्यामुळे गणेशोत्सवापासून किलकिली होऊ लागलेली अनेक दारे दिवाळीनिमित्त जणू सताड उघडली, त्या आनंदात ग्राहकांनी पण देशभर खरेदीचा सपाटा लावलाय, असे दिसले. एकूण आकडेवारी पाहता भारत ही भली मोठ्ठी बाजारपेठ आहे, याचा प्रत्यय जगभरातील उत्पादक आणि विक्रेत्यांना आला. कुशल विक्रीतंत्राच्या रिमोटवर ग्राहकांना खरेदीसाठी कसे नाचवले जातेय, हेही स्पष्ट झाले.


हळूहळू उत्सवाचा उन्माद ओसरेल, त्यावेळी आपण थोडे आत्मपरीक्षण करायला हवे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘मी जागरूक ग्राहक कसा/कशी होईन याचा ध्यास घेण्याचे ठरवले पाहिजे.’ उत्सव साजरे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काहीतरी नवीन वस्तू खरेदी करणे, या मानसिकतेतून बाहेर पडायची गरज आहे. मी पर्यावरणप्रेमी नागरिक आहे आणि कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा व आर्थिक प्राथमिकता सांभाळून पर्यावरण रक्षण व आर्थिक हितरक्षण सुद्धा होऊ शकेल असे मार्ग, अशा युक्त्या कुठे सापडल्या अगर मलाच सुचल्या तर त्यांचे अनुसरण वैयक्तिक जीवनात करणे आणि इतरांना त्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करणे, हा वसा घ्यायला हवा आहे. प्रगत देशातील अनेक जागरूक महिलांनी असा वसा घेतलाय.


आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे, तिचे अनुकरण सहज शक्य आहे. जगभरात विविध ठिकाणी फेसबुक / सोशल मीडिया ग्रुप्स करून ‘थ्री आर’बाबत (री यूज, रिपेअर, रिसायकल) जागृती आणि कृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे पालन आपल्या संस्कृतीत नकळत होतच होते. खासकरून वाढत्या वयाची मुलं आणि वृद्ध यांच्या गरजा पुरवताना याचा अवलंब होई. यातून ‘थ्री आर’ची उद्दिष्टे आपोआप साध्य होत असत. कपडे, खेळणी, गोष्टीची पुस्तके, तिचाकी, दुचाकी आणि इतर अनेक वस्तू सुद्धा अशा रीतीने अनेक घरी फिरतीला जात असत.


हाच देव-घेवीचा सिलसिला आता सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू झालाय आणि त्याचे एक रूप म्हणजे ‘नथिंग टू बाय’ या नावाची चळवळ. तिच्यामागची भूमिका अशी -


हे दान नाही, उपकार नाहीत. हेतू आहे पर्यावरण रक्षण आणि आर्थिक नियोजन.
माझ्याकडील उपयोगी व वापरण्यायोग्य वस्तूंची / कपड्यांची माहिती मी ग्रुपवर देईन.


Ø या उपक्रमामुळे भंगार म्हणून कचरा डेपोत जाणाऱ्या वस्तूंची संख्या कमी होईल.
लहान मुलांच्या हौसेसाठी/हट्टासाठी अवाजवी खर्च होणे थांबेल.


वृद्धांची सोय म्हणून आणलेल्या वस्तू माळ्यावर टाकण्याऐवजी इतर कुणाला हव्यात तर त्याची माहिती मी ग्रुपवर देईन.
माझी गरज ग्रुपवर देण्यात मी कमीपणा मानणार नाही.


ग्रुपवर असलेल्या व्यक्ती, संकुल अगर परिसरातील कुटुंबे मिळून महिन्यातील एक दिवस नक्की करतात आणि त्या दिवशी ठरावीक वेळी, ठरलेल्या ठिकाणी या वस्तू नीट-नेटक्या पद्धतीने घेऊन येतात. तिथे देवाण-घेवाणीबरोबर प्रत्यक्ष भेट घडते / नवी ओळख होते. आजूबाजूलाच असूनही परक्याच राहिलेल्या व्यक्ती जवळ येतात. समविचारी व्यक्तींचे असे गट इतर काही समाजोपयोगी कामातही सामील होतात. त्यातूनच ‘तीन आर’ला अजून दोन आर काही गटांनी जोडले आहेत. ते म्हणजे रिथिंक आणि रिफ्यूज. म्हणजेच मोहाला बळी पडून होणारी खरेदी टाळावी, असेच सुचविले आहे.


अशा प्रकारचे गट स्थापन करणे, आपल्याला ही सहज शक्य आहे. या गटात कुणाची आर्थिक सुस्थिती, खरेदीची कुवत, जीवनशैली इत्यादी विषयक चर्चांना वाव नाही. ‘मिळून सारे जण, करू स्वसंरक्षण’, असा यामागचा हेतू आहे. कारण या देवघेवीमुळे अनेक वस्तू आणि कपडे, खेळणी आणि पुस्तके, उपकरणे आणि तत्सम वस्तू यांची खरेदी मुळात कमी होईल. जेणेकरून महाप्रचंड प्रमाणात होणाऱ्या उत्पादनाला हळूहळू, पण निश्चित आळा बसेल. उत्पादन मर्यादित झाले, तर निसर्गाची हानी कमी होईल. म्हणजे एका बाजूने कचरा कमी व दुसरीकडे उत्पादन मर्यादित. शिवाय, स्वत:ला लहान व्हायला लागलेले बूट छान पॉलिश करून दुसऱ्या मुलास स्वत: देण्याने मुलावर संस्कार होतील, तो अजून एक बोनस. ते बूट काही ऑनलाइन यंत्रणेसारखे / दुकानातल्या सारखे मोठ्या खोक्यात येणार नाहीत. त्यामुळे वेष्टणाचा कचरा कमी होईल.


या सगळ्या फायद्यांची जाणीव ‘नथिंग टू बाय’, ग्रुप्सच्या सदस्यांना झाली आहे. चळवळ विस्तारू लागली आहे. रिड्यूस, रियूज, रिसायकल याबरोबर रिफ्यूज आणि रीथिंक जोडून घेणारा हा विचार खूप महत्त्वाचा आणि कृतीत उतरविण्यासारखा आहे. आपणही एक ठाम पाऊल उचलूया, मग अनेक हात पुढे येतील हे नक्की!


mgpshikshan@gmail.com

Comments
Add Comment

निकोबार द्वीप समूहाचा व्यूहात्मक विकास

केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेट समूहाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान लक्षात

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

विद्युत वाहनांस प्रोत्साहन

मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी

विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार?

विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे

नव्या दोस्तीची अमेरिकेला धास्ती

प्रा. जयसिंग यादव डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीमुळे चीन, भारत, रशिया अमेरिकेची व्यूहनीती झुगारून एकत्र आले.

चौकटीपलीकडचा शिक्षकी पेशा...

आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका अधिक आव्हानात्मक झाली आहे. सध्याच्या तंत्रबदलत्या युगात शिक्षणाच्या कल्पना