दुबई (वृत्तसंस्था) : यूएईत सुरू असलेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात (ग्रुप-२) भारताची गाठ स्कॉटलंडशी आहे. अफगाणिस्तानला हरवून गुणांचे खाते उघडले. आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीयांना आज तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्ध्यांना हरवून आणखी एका विजयाची संधी आहे.
दोन कठीण पेपरनंतर अफगाणिस्तानविरुद्धचा सोपा पेपर भारताने चांगल्या प्रकारे सोडवला. आजचा (शुक्रवार) पेपरही तुलनेत सोपा आहे. त्यातही मोठ्या फरकाने बाजी मारल्यास विराट कोहली आणि कंपनीला अंतिम चार संघांत स्थान मिळवण्याची आशा वाढेल. अफगाणिस्तानच्या स्वैर गोलंदाजांना खरपूस समाचार घेत उपकर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने फॉर्म मिळवला. कोहलीने रिषभ पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याला बढती दिली. दोघांनीही फलंदाजीचा आनंद लुटताना रोहित-राहुलने रचलेल्या पायावर कळस चढवताना टीम इंडियाला दोनशेपार मजल मारून दिली.
भारताचे मोठे आव्हान अफगाणिस्तानला पेलणारे नव्हते. त्यात अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनला खेळून काढणे त्यांना शक्य झाले नाही. अष्टपैलू पंड्या गोलंदाजीत चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण करू शकला नाही. वेगवान गोलंदाज शार्दूलही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या तरी एक ओव्हर महागडी ठरली. फलंदाजांना सूर गवसला तरी भारताला गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे. पहिल्या-वहिल्या विजयानंतर कोहलीने अश्विनचे गुणगाण गायले तरी पाकिस्तान किंवा न्यूझीलंडपैकी एका सामन्यात त्याला खेळवण्याची गरज होती, हे त्याच्या देहबोलीमधून जाणवत होते. अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया हे संघ भारताच्या आगेकूच करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण लाइफलाइन आहेत. या तिन्हीचा योग्य वापर केल्यास स्पर्धेतील आव्हानही टिकून राहील. शिवाय रंगतही वाढेल.
काइल कोइत्झरच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंडला सूर गवसलेला नाही. अफगाणिस्तान, नामिबिया आणि न्यूझीलंडविरुद्ध मात खावी लागली. अफगाण आणि नामिबियाच्या तुलनेत त्यांनी किवींना चांगली लढत दिली. त्यांच्याकडून फलंदाजीत बॅरिंगटन, लिस्क आणि क्रॉसने फलंदाजीत थोडी चमक दाखवली. डॅव्ही, व्हील व शॅरीफने बऱ्यापैकी गोलंदाजी केली आहे. तरीही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्कॉटिश संघाचा भारताविरुद्धही कस लागेल.
भारताला आणखी एक मौका
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केले. तसेच विश्वचषकात भारताविरुद्ध पराभूत होण्याची परंपराही खंडित करतानाच सलग ४ सामने जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने एक व्हीडिओ पोस्ट करत भारतीय संघाला डिवचले आहे. आम्ही अंतिम फेरीत भारताला आणखी ‘मौका’ देऊ इच्छितो, असे त्याने म्हटले आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाला मोठ्या फरकाने हरवल्याने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे अंतिम फेरीचा सामना भारत आणि पाकिस्तान संघात होऊ दे, अशी आशा शोएब अख्तरने व्यक्त केली आहे. आम्ही भारताला अंतिम फेरीत हरवू इच्छितो. यासाठी आम्ही प्रार्थना करतो की, भारत अंतिम फेरीत यावा, असे शोएबने म्हटले आहे.
असे आहे समीकरण
भारताला अफगाणिस्तानला १०० धावांमध्ये ऑलआऊट करायचे होते, पण तसे झाले नाही. पण त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आलेले नाही. आता स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी मोठा विजय साकारला, तर त्यांना उपांत्य फेरीच्या दिशेन पाऊल टाकता येऊ शकते. भारताने स्कॉटलंडवर ८० पेक्षा जास्त धावांनी विजय साकारला, तर त्यांच्यासाठी हे हिताचे ठरणार आहे. कारण आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी विजयाबरोबरच भारताला रनरेट हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे. दोन पराभवांमुळे भारताचा रनरेट हा -१.६०९ असा होता. पण बुधवारी अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवल्यामुळे भारताचा रनरेट आता +०.०७३ एवढा सुधारला आहे.
वेळ : सायं. ७.३० वा.