भारताच्या क्रिकेट संघाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू असलेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीत पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध पराभव पाहावा लागला. भारताचा संघ जगातील अव्वल संघ आहे. आयसीसी टी-ट्वेन्टी क्रमवारीतही वरचे रँकिंग, माजी विजेता तसेच सध्याचा फॉर्म पाहता विराट कोहली आणि सहकारी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र, सलग पराभवांमुळे भारताची दावेदारी अडचणीत आली आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवांपेक्षा भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, याचे अधिक दु:ख झाले. पराभवांतही शान असायला हवी. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने एकहाती विजय मिळवत भारताचा सुपडा साफ केला. एक अव्वल संघ म्हणून भारताकडून चुरशीची लढत अपेक्षित होती; परंतु टीम इंडिया सर्व आघाड्यांवर अपयशी ठरली आणि प्रतिस्पर्धी संघांना विजय मिळवण्यास फार प्रयास पडले नाहीत. फलंदाजी आणि गोलंदाजीतील अपयश हे मानहानिकारक पराभवांसाठी कारणीभूत ठरले. भारताची फलंदाजी वर्ल्डक्लास आहे. मात्र, ती केवळ कागदावर आहे, हे टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये पाहावयास मिळाले. सलामीवीर तसेच उपकर्णधार रोहित शर्माला दोन सामने मिळून केवळ १४ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. लोकेश राहुलनेही निराशा केली. त्यात आयपीएलमधील फॉर्म राखता आलेला नाही. राहुलला २१ धावा जमवता आल्यात. कर्णधार कोहलीने पाकिस्तानविरुद्ध संयम दाखवताना अर्धशतक झळकावले. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. यष्टिरक्षक, फलंदाज रिषभ पंतला ५१ धावा करता आल्या. अष्टपैलू हा संघातील महत्त्वाचा घटक असतो. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने सर्वच आघाड्यांवर निराशा केली. पंड्याने दोन्ही डाव मिळून ३४ तसेच जडेजाने ३९ धावा जमवल्या. अव्वल पाच फलंदाजांपैकी एकालाच हाफ सेंच्युरी मारता आली. यावरून ढेपाळलेल्या फलंदाजीचा अंदाज येतो. भारताच्या गोलंदाजांनीही फलंदाजाचा कित्ता गिरवला आहे. बॉलिंगचा स्तरही खालावला आहे. सर्वांना मिळून दोन सामन्यांत केवळ दोन विकेट घेता आल्यात. त्या विकेट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तसेच नवोदित वरुण चक्रवर्तीला दोन सामने खेळून एकही फलंदाज बाद करता आलेला नाही. पंड्या आणि जडेजा यांनाही प्रभावी बॉलिंग करता आलेली नाही. एकेक सामना खेळूनही भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर ही वेगवान दुकली विकेट घेण्यात अपयशी ठरली.
भारताच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. प्रमुख फलंदाज आणि लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे शेर, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये ढेर झाले. याचा अर्थ आपले क्रिकेटपटू देशहितापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात. मुळात जवळपास महिनाभर चाललेली आयपीएल आणि टी-ट्वेन्टी वर्ल्डकप यांच्यात फक्त आठ दिवसांचा फरक होता. भारताच्या अपयशानंतर बीसीसीआयला त्यांची खासगी टी-ट्वेन्टी स्पर्धा अधिक महत्त्वाची की, जागतिक दर्जाची टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धा, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दोन स्पर्धांतील कमीत कमी कालावधी भारताच्या क्रिकेटपटूंसाठी मारक ठरला आहे. शिवाय जवळपास १४ सामने खेळल्याने ते प्रचंड थकले आहेत. त्यामुळे टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेतील अपयशाला आयपीएल अधिक कारणीभूत आहे, असे क्रिकेटप्रेमींसह जाणकारांचे म्हणणे आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी भारताने सल्लागार, मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड केली. वास्तविक पाहता मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी वेगवेगळे कोच असताना मेंटॉरची गरज नव्हती. मात्र, बीसीसीआयने धोनीच्या अनुभवाचा फायदा करवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोगही तूर्तास फसला, असे दिसत आहे. मात्र, खराब किंवा खालावलेल्या सांघिक कामगिरीसाठी मेंटॉरला दोष देणे चुकीचे आहे. धोनीची नियुक्ती महान क्रिकेटपटू, समालोचक सुनील गावस्कर यांनी केलेले भाष्य इथे नमूद करावे लागेल. मैदानावर उतरणारा संघ चांगली कामगिरी करणार नसेल, तर मेंटॉरचा उपयोग शून्य ठरतो. गावस्कर यांचे निरीक्षण तंतोतंत खरे ठरले आहे. आपले क्रिकेटपटू जिंकण्याच्या ईर्ष्येने खेळताना दिसत नाहीत. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलत आहे.
सुपर-१२ फेरीत १२ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात सहा संघ आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला किमान पाच सामने येणार असून त्यात जास्तीत जास्त विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीसाठी दावेदारी पेश करणार आहे. सलग दोन पराभवांनंतर विराट कोहली आणि सहकाऱ्यांची आगेकूच धोक्यात आली आहे. सेमीफायनलसाठी दावेदारी पेश करायची झाल्यास टीम इंडियाला आता उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. शिवाय रनरेटही महत्त्वाचा ठरेल. भारताचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध आहेत. तुलनेत अननुभवी प्रतिस्पर्धी असले तरी त्यांना कमी लेखूनही चालणार नाही. विराट कोहली आणि कंपनीला उशिराने का होईना, सूर गवसला आणि त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पुढे अंतिम फेरी गाठली तरी सुरुवातीचे पराभव विसरता येणार नाहीत.
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…
नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…
जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…