मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; माजी गृहमंत्र्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी
मुंबई (प्रतिनिधी) : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सोमवारी मध्यरात्री देशमुख यांना ताब्यात घेतले. मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने देशमुख यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले आणि १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या कोठडी दरम्यान घरचे अन्न आणि औषधे मिळण्यासाठी केलेल्या अर्जाला परवानगी दिली आहे. तसेच ईडीकडून चौकशीदरम्यान अनिल देशमुखांच्या वकिलाला हजर राहण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.
देशमुखांना अटक करण्यात आलेले मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुख यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले, असा दावा त्यांनी केला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात एजन्सीच्या वतीने युक्तिवाद केला.
गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख सोमवारी प्रथमच समोर आले आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. त्यांची दिवसभर चौकशी झाली. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
मनी लॉन्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीच्या रडारवर होते. माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनीलॉन्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने कारवाई सुरू केली.