Wednesday, May 7, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम बंद पाडले

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम बंद पाडले

शिवसेनेविरोधात वरळीचे मच्छीमार आक्रमक




मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा, विशेषत: शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. कोणतीही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप करत शनिवारी मच्छीमारांनी भर समुद्रात जाऊन कोस्टल रोडचे काम बंद पाडले. या प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमारांनी जोरदार निदर्शने केली.


कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे. तसेच या बार्जेसमुळे जाळ्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी समुद्रातील बार्जवर जाऊन काम बंद पाडले.


याआधी मच्छीमारांनी संयम दाखवत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती. पण आता प्राधिकरणाच्या मनमनी कारभाराला चाप लावण्यासाठी स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक मच्छीमारांनी घेतली आहे.


मासेमारीला जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या दरम्यानचे अंतर २०० मीटर ठेवावे, अशी मच्छीमारांची मुख्य मागणी आहे. प्राधिकारणाने मात्रे हे अंतर ६० मीटर ठेवण्याचे ठरवले आहे. यामुळे दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणत्याच विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप मच्छीमारांनी केला आहे.­ याबाबत आक्रमक होत मच्छीमारांनी भर समुद्रात बोटी नेत हे काम बंद पाडले. या आंदोलनामुळे वरळी कोळीवड्यातील वातावरण तापले असून परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.


आदित्य ठाकरेंवर टीका


संतप्त मच्छीमारांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या गावातून आणि मदत दुसरीकडे करतात. असे कसे चालेल.

Comments
Add Comment