केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातील उद्योजकांना आवाहन
कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग येणार आहेत; यासाठी उद्योजकांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन या उद्योगांना साथ दिली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये झालेल्या बैठकीत नारायण राणे बोलत होते. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांची विशेष बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित केली होती. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील उद्योगांचा आढावा घेतला गेला, तसेच कुडाळ आणि आडाळी एमआयडीसी भागांमध्ये ज्या समस्या आहेत, त्या समस्या उद्योजकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समोर मांडल्या. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये नवे उद्योग येणार आहेत आणि या उद्योजकांना आपल्या उद्योजकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. येथे उद्योग निर्माण झाले, तर आपल्या जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होऊन आर्थिक उन्नती निर्माण होईल.
यासाठी उद्योजकांनी सकारात्मक विचार करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. कुडाळ एमआयडीसी असो किंवा आडाळी एमआयडीसी या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत. कुक्कुटपालनसारख्या योजना शेतकऱ्यांच्या माध्यमातून राबवून कोंबडी खरेदी करणारी वेंकीज कंपनी या ठिकाणी येणार आहेत, असे त्यांनी सांगून पुढील काळामध्ये उद्योजकांची विशेष बैठक आयोजित केली जाईल आणि यासाठी अधिकारीसुद्धा उपस्थित असतील, असे सांगितले.
यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रणजित देसाई, आनंद बांदिवडेकर, मोहन होडावडेकर, कमलाकांत परब, बाबा मोंडकर, सतीश पाटणकर प्रसाद देवधर, विलास हडकर उपस्थित होते.