
मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या स्थितीत मुंबईतील कोरोना नियंत्रणात असला तरी दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या काही कमी नाही. यामुळे डिसेंबरच्या शेवटपर्यंत तरी पालिकेने खास कोरोनासाठी उभी केलेली आरोग्य यंत्रणा जम्बो सेंटरसह सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेतील उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले. दरम्यान दिवाळी सणाचे दिवस हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे असणार आहेत. सणासाठी बाजारात होणारी गर्दी पाहता कोरोना वाढण्याची भीती अद्यापही पालिकेला आहे.
दरम्यान सणांमध्ये कोरोना वाढू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. दिवाळीनंतर ख्रिसमस आणि वर्षअखेर-नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या जल्लोशाचा कार्यक्रम पाहाता पालिका आपली आरोग्य यंत्रणा सुरू ठेवणार आहे. तसेच सणांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दोन लाटा आल्या. कोरोनामुळे आतापर्यंत १६,२२५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७,३२,८८९ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. असे असले तरी आगामी काळात येणारे सण - उत्सव यामध्ये होणारी गर्दीमुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
सध्या २० हजार बेडवर फक्त १० टक्के रुग्ण
पालिकेने कोरोना रुग्णांना आवश्यक प्रमाणात बेड उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेल्या जम्बो कोविड सेंटरसह एकूण उपलब्ध २० हजार कोविड बेडवर फक्त १० टक्के रुग्ण आहेत. यामध्ये नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये फक्त ३४, एनएससीआय वरळी - ४२, बीकेसी - १७ आणि मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये फक्त २२ रुग्ण आहेत. तर दहिसर, मालाड, कांजूरमार्ग येथील कोविड सेंटर बंद असून शीव येथील सेंटर सुरू करण्यात आलेले नाही.