मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील दिवाळी सणामुळे चीनमधील उद्योगपतींचीही दिवाळी साजरी होत असते. पण यंदा मात्र तसे चित्र नाही. दिवाळीपूर्वीच चीनचे दिवाळे निघाले आहे. देशात चायना वस्तूंवर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे चीनचे जवळपास ५० हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्ष सर्व सणवारांवर निर्बंध आले होते. आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे आणि लसीकरणही वेगात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यंदा घरगुती स्तरावर ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणावर उलाढाल होईल, असा अंदाज आहे.
देशभरात ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी दिसत आहे, त्यामुळेच व्यापारी वर्गाला एका मोठ्या आर्थिक उलाढालीची अपेक्षा यंदाच्या उत्सावातील खरेदी-विक्रीतून आहे. दिवाळी कालावधीतील खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या वर्षी 2 लाख कोटी रुपयांची भर अर्थव्यवस्थेत पडेल, अशी आशा कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केल आहे. त्याचबरोबर देशात चायना मालावर बहिष्कार करण्याच्या आवाहनामुळे यंदाच्या सण उत्सवाच्या तोंडावर चीनला व्यापारात ५० हजार कोटीचं आर्थिक नुकसान झाले आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही कॅटने चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून देशातील व्यापारी आणि आयातकर्त्यांनी चीनमधून माल मागवणे बंद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरापासून ग्राहकांनीही चायना मालाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, स्वदेशी, भारतीय सामानास बाजारात चांगली मागणी होत आहे.