नवी मुंबई (प्रतिनिधी) : मनपाचे झीरो कचरा कुंडी अभियान संपण्याच्या मार्गावर असून, तुर्भे येथील मनपा विद्या मंदिरासमोरच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसहित शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेसमोर कचरा टाकण्यावर प्रतिबंध आणावा, अशी मागणी सेना शाखाप्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत मनपाकडून यावर्षी झीरो कचरा कुंडी अभियान राबविले होते. कचरा घंटा गाडीद्वारे क्षेपणभूमीमध्ये टाकला जात होता; परंतु घंटा गाडी वेळेवर येत नसल्याने शाळेसमोर कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.
या ठिकाणी कचरा वाहतूक करणारी वाहने नियोजित वेळेत सुरू करण्यात येतील. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. – सुधाकर वडजे, स्वच्छता अधिकारी, तुर्भे