।। राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय।।
भालचंद्र महाराजांचा जन्म तिन्ही लोकांत झेंडा लावण्यासाठी होता. शिक्षण शिकून कुठेतरी हुद्याची नोकरी मिळवून व प्रपंच करून स्वत:साठी जगण्यासाठी नव्हता, तर त्याचा जन्म अशासाठी होता की, आपण दु:खात राहून दुसऱ्याला सुख देण्यासाठी होता. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ ही संत रामदासांची पवित्र वाणी त्याच्या कानात निनादत होती. त्या व्यतिरिक्त समाजात जो अधर्म, अनिती आणि अत्याचार माजला होता तो त्याला असह्य झाला होता. वास्तविक प्रपंचाचा वीट त्याला लहान वयाचत होता. प्रपंच हा एक प्रकारचा महापूर असून त्या पुरात डंख मारणारी अनेक जलचरे आहेत ! काळसर्प पण आहेत. हे समर्थ रामदासांचे तत्त्व त्याला अगदी पटले ओते. अशा अनेक कारणांनी भालचंद्र भारावून गेला होता. त्याचे मन एवढे खंबीर बनले होते की, ते कोणीच बदलू शकता नसता. आपण आजन्म ब्रह्मचारी राहणार ही तर त्याची घोर प्रतिज्ञाच होती.
संत रामदास, संत गाडगेबाब यांनी जसा जगाच्या कल्याणासाठी गृहत्याग केला तसा भालचंद्रचा पण सुदिन उगवला. घरात मारपीट होऊ लागल्याने भालचंद्र एके दिवशी घरापासून फार दूरवर असलेल्या जुनाट एका वडाच्या झाडावर चढून गप्प बसला होता. तो रात्र झाली असता तिथूनच पसार झाला. अशारितीने माया-मोहावर पाणी सोडून प्रभू रामचंद्रासारखा घोर वनवास पत्करला.
कोकणातून देशावर : भालचंद्र सुमारे वर्षभर अखंड कोकणात भटकून भटकून शेवटी फोंडा घाटांतून स्वारीने देशावर पलायन केले. कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटीहून सुमारे आठ-दहा मैलावर नितवडे नावाचे एक गाव आहे, त्या गावी भालचंद्राचे चुलते सीताराम रघुनाथ ठाकूर म्हणून राहत असत. तिथे त्यांनी स्वत:चे घर बांधून शेतीवाडी करून ते फार सधन असे होते. तिथे तो एके दिवशी पदयात्रा करीत दत्त म्हणून हजर झाला.
भालचंद्राची ती अस्ताव्यस्त अवस्था पाहून सर्व मंडळी चकित झाली. त्यांची वाढलेली दाढी पाहून सर्वांना अतिशय वाईट वाटले. भालचंद्राला ताबडतोब आंघोळ वगैरे घालून नवे कपडे वापरण्यास दिले. नितवडे येथे तो चार-सहा महिने अगदी व्यवस्थित राहू लागला. समाजवादी संत श्रीगाडगेबाबा असेच घरातून पळाले असता पाच-सहा वर्षांनी त्यांच्या आईने ऋणमोचनच्या जत्रेतून त्यांना ओळखून धरून घरी आणले असता तीन-चार वर्षे ते अगदी आपला संसार व्यवस्थित हाकत असत. नंतर पसार झाले. अगदी तीच अवस्था भालचंद्राची झाली. (क्रमश:)