Thursday, April 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखविश्वनाथाय नमो नम:, काशी विकासाचे मॉडेल

विश्वनाथाय नमो नम:, काशी विकासाचे मॉडेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील जीर्णोद्धार केलेल्या श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण केले आणि देशभरात हिंदुत्वाचे एक वादळ उभे राहिले. देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, असा विश्वनाथ धाम भव्यदिव्य प्रकल्प उभा राहिला आहे. काशी विश्वनाथ धाम ही वास्तू धार्मिक, ऐतिहासिक आणि महान परंपरा असलेली आहेच, पण त्याचे नूतनीकरण करून या वास्तूने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शेकडो पुरातन व ऐतिहासिक मंदिरे आहेत.

स्वातंत्र्यानंतर देशावर सर्वाधिक सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या सरकारने आणि काँग्रेसने देशाला दिलेल्या पंतप्रधानांनी या ऐतिहासिक ठेव्यांकडे दुर्लक्ष केले. केवळ निवडणुकीतील मतांसाठी आणि व्होट बँक जपण्यासाठी काँग्रेसने मुस्लिमांचा अनुनय सतत चालू ठेवला. हा विशाल देश हिंदूंचा आहे, या वास्तवतेकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. देशातील कोटी कोटी हिंदूंच्या मनातील वेदना नरेंद्र मोदींनी आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने ओळखली आणि श्री काशी विश्वनाथ धामाचे भव्य लोकार्पण करून या जनतेला सुखद धक्का दिला.

काशीमध्ये जे काही घडते आहे, ते केवळ महादेवाच्या कृपेने. इथे फक्त डमरूवाल्यांचे सरकार आहे, असे सांगण्याची हिम्मत केवळ मोदीच दाखवू शकतात. काशी विश्वनाथ धामाचे नूतनीकरण हा मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रेवती नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर त्यांनी त्याचे लोकार्पण केले. बाबा विश्वनाथांना वंदन करून भाषणाला सुरुवात केली. भाषणाची सुरुवात भोजपुरीत करून जनतेला आश्चर्याचा धक्का दिला. अगोदर कालभैरवाचे दर्शन घेतले आणि माता अन्नपूर्णाच्या चरणांना वारंवार वंदन केले. ही सर्व या देशातील जनतेची श्रद्धास्थाने आहेत. या पूर्वी कोणत्याही पंतप्रधानांना आणि उत्तर प्रदेशच्या बिगरभाजपच्या मुख्यमंत्र्याला जनतेच्या श्रद्धास्थानांसमोर नतमस्तक व्हावे, असे कधी वाटले नव्हते. त्यांचे धर्मनिरपेक्षतेचे पितळ मोदींनी उघडे पाडले. धर्मनिरपेक्षतेची भाषा करणारे कसे ढोंगी आहेत, हेच मोदींनी देशाला दाखवून दिले.

काशी विश्वनाथ धामचा विकास आणि विस्तार दोन्ही साध्य झाले आहे. काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधानांनी महापूजा केली. काशीची माती इतरांपेक्षा वेगळी आहे, हे आवर्जून सांगितले. पंतप्रधान स्वत: खिडकीया घाटापर्यंत पायी गेले. नंतर बोटीत बसून ललिता घाटावर पोहोचले. ललिता घाटावरून गंगाजल घेऊन काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. गंगाजलाने बाबांवर अभिषेक केला. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांचे गृहराज्यावर म्हणजेच गुजरातवर जेवढे प्रेम आहे, तेवढेच वाराणसीवर आहे. आपला मतदारसंघ स्वच्छ, सुंदर देखणा असावा. धार्मिक व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे. जनतेला सर्व सेवा-सुविधा उपलब्ध असाव्यात, विविध विकास प्रकल्प वेगाने राबवले जावेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो. विश्वनाथ धामाच्या जीर्णोद्धारावर आठशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. पाच लाख सत्तवीस हजार चौरस फूट क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. मंदिराचा परिसर आता एवढा विस्तीर्ण झाला आहे की, एकाच वेळी पन्नास ते सत्तर हजार भाविक तेथे दर्शन घेऊ शकतील. या सर्व संकुलातील चाळीसपेक्षा जास्त पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गंगा व्ह्यू गॅलरी, मणिकर्णिका, जलासेन, ललिता घाट यांची प्रवेशद्वारे व रस्ते मोठे आणि भव्य करण्यात आले आहेत.

काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंमकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, बैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर, कृष्णेश्वर ही कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. त्यांचा काळानुसार विकास झाला पाहिजे. काशी विश्वनाथ धामाच्या जीर्णोद्धारानंतर अन्य धार्मिक स्थळांच्या विकासाला वेग यावा, हीच अपेक्षा आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा इसवी सनपूर्व ११व्या शतकात राजा हरिश्चंद्रने जीर्णोद्धार केला होता. नंतर सम्राट विक्रमादित्यानेही केला. मोहम्मद घोरीने ११९४ मध्ये या मंदिराची लूट केली. मंदिराची तोडफोड केली. १५८५ मध्ये राजा तोडरमलच्या मदतीने पंडित नारायण भट्ट यांनी मंदिर पुन्हा उभारले. १६३२मध्ये शहाजहाँने मंदिर तोडायला सैन्य पाठवले होते. आजूबाजूची त्यांनी ६३ मंदिरे तोडली. पण हिंदूंच्या प्रचंड विरोधामुळे सैन्याला मंदिरापर्यंत पोहोचता आले नव्हते. १७७७-१७८०च्या काळात महाराणी अहिल्याबाईंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ग्वाल्हेरच्या बैजाबाई व नेपाळचे महाराजा यांनीही मंदिराच्या विकासात योगदान दिले होते.

८ मार्च २०१९ रोजी काशी विश्वनाथ धामाच्या कॅरिडॉरचे पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केले होते. दोन वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण झाला. गंगा नदीच्या पवित्र काठावर भारतीय संस्कृती वसली आहे, याचा उल्लेख मोदींनी भाषणातून केला. रोज दोन हजारांपेक्षा जास्त मजूर व कामगार या प्रकल्पासाठी अहोरात्र झटले, त्याची जाणीव ठेऊन मोदींनी त्यांच्या अंगावर फुले उधळली. मोदी आपले संसदेतील लोकप्रतिनिधी आहेत, ते निश्चितच चांगले काम करतील, असा विश्वास वाराणसीतील मतदारांनी त्यांच्यावर ठेवला होता. तो मोदींनी सार्थ करून दाखवला. दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांगांना आणि वयस्कर भाविकांना आता बोटीतून जेटीपर्यंत येता येईल, जेटीतून घाटावर येण्यासाठी एस्केलेटरची सुविधा आहे. तिथून त्यांना थेट मंदिरात जाता येईल. या सोहळ्याला भाजपशासित बारा राज्यांचे बारा मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. न भूतो न भविष्यती असा हा लोकार्पण सोहळा झाला. विश्वनाथाय नमो नम:

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -