मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात होत असताना पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने डोकं वर काढलंय. पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या सगळ्यात विविध नियम लागू करण्यात आले आहेत. एकीकडे चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये 50 टक्के आसनक्षेमतेची परवानगी असताना आता काही ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंधने वाढवण्यात आली आहेत.
याच कारणामुळे कोल्हापूर भागात नाट्यगृहांमध्ये आता 50 प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील नाटकाचे काही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. अभिनेते संदीप पाठक यांचं ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ नाटकाचे प्रयोग कोल्हापूरात होणार होते. मात्र फक्त 50 प्रेक्षकांना परवानगी असल्या कारणाने कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. फक्त 50 प्रेक्षकांना परवानगी असल्याने या नाटकांसाठी ही बाब परवडणारी नसल्याने या नाटकाचे प्रयोग काही ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.