Friday, March 29, 2024
Homeमहत्वाची बातमीउष:काल दूर नाही...

उष:काल दूर नाही…

स्वाती पेशवे

सुरुवात आणि शेवट हे चक्र एका गतीनं फिरत असतं. सुरुवात होते, त्या प्रत्येकाचा कधी ना कधी शेवट होत असतो आणि शेवटाच्या गर्भातच नवा कोंब अंकुरत असतो. मात्र युगानुयुगाचं हे चक्र परिचित असूनही कोणत्याही गोष्टीची अखेर आपल्याला व्यथित अथवा भावुक करून जाते, तर कोणतीही सुरुवात उल्हासित करून जाते. नववर्ष उंबऱ्यावर येऊन ठेपलं की, येणारा काळ आनंदपर्व घेऊन येईल, असं म्हणत त्याचं जल्लोशात स्वागत करताना ही उल्हासित अवस्था आपण प्रत्येकजण अनुभवतो. आताही या सार्वत्रिक मानसिकतेनं रमणीय झालेलं वातावरण आपण पाहत आहोत.

बहुतेकांचे नववर्षाच्या स्वागताचे बेत ठरले आहेत. सलग काही महिन्यांचा काळ प्रचंड दडपणाखाली काढल्यानंतर मिळालेला हा निवांत आणि काहीसा निर्धास्तपणा सगळ्यांना सुखावून जात आहे. म्हणूनच सगळ्यांनी येणाऱ्या वर्षाच्या सहर्ष स्वागताला सज्ज राहू या. येणारं वर्ष मंगलमय असेल, अशी आशा व्यक्त करू या. अर्थात, हे करत असताना गेली जवळपास दोन वर्षं कोरोनाच्या संक्रमणकाळानं हिरावून घेतल्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण धास्तावलेला असणं स्वाभाविक आहे.

प्रत्येकाचं काही ना काही हरवलेलं असताना मनाचा एक कोपरा कातर झालेले अनेकजण आपण आजूबाजूला पाहात आहोत. त्यातच कोरोनाच्या विषाणूचा नवा अवतार जगभर धुडगूस घालत असल्यामुळे भविष्यकाळात नेमकं काय वाढून ठेवले आहे, याची धास्ती मनामनात आहे. मुलांच्या शिक्षणापासून तरुणांच्या कारकिर्दीपर्यंत आणि छोट्या गृहोद्योगापासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाला जाणवलेले कोरोनाचे चटके अजूनही जळजळत असल्यामुळे भविष्यात आणखी एका दुष्टचक्राला सामोरं जाण्याची मानसिकता आता कोणामध्येही उरलेली नाही. म्हणूनच आता येणारं वर्ष या सर्व नष्टचर्यातून आपली सुटका करणारं असो ही सार्वत्रिक प्रार्थना करूनच नव्या उमेदीनं नववर्षाच्या स्वागताला सज्ज होऊ या.

जुने जाऊ द्या मरणालागुनी… असं म्हणत नवी उमेद धारण करण्यासाठी थोडी सकारात्मकता अंगी बाणवणं गरजेचं आहे. काजळी दूर केल्याखेरीज दिवा तेजोमय दिसत नाही. त्याचप्रमाणे मनातली धास्ती अथवा भीती दूर केल्याखेरीज परिस्थितीतली सकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच सर्वप्रथम इतक्या घातक आणि जीवघेण्या स्थितीतही आपण धडधाकट असल्याबद्दल संतोष व्यक्त करणं, हेच पहिलं सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल. अनेकांच्या अकाली मृत्यूनं जगण्याची नेमकी परिभाषा आपल्याला समजली आहे. त्यामुळे आता बहुतेकांचे संकल्प स्पष्ट आहेत. नेमकं कोणासाठी, कशासाठी आणि किती पळायचं हे अधोरेखित झाल्याने अनेक चेहरे आज डोळ्यांवरची झापडं काढून येणाऱ्या वर्षाच्या स्वागताला अधिक डोळसपणे सज्ज आहेत. त्यामुळेच आता स्वत:ला आणि परिस्थितीला गृहित न धरणाऱ्या समाजाचा नवा चेहरा बघायला मिळणं ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. नव्यानं स्वत:ची, जगण्याची आणि जगाची ओळख पटलेलं समाजमन यापुढे कोणताही धोका पत्करणार नाही. ही सजगता आणि विस्तारीत दृष्टिकोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास पूरक ठरेल यात शंका नाही.

माणसाला माणसाचं नेमकं महत्त्व पटण्यास आणि समस्त मनुष्यजातीला ‘निसर्ग’ नामक किमयागाराची खरी ताकद समजावून सांगण्यास गतकाळानं मोठी मजल मारल्यामुळे हे शहाणपण घेऊनच पुढे सरकणारा हा समाज पृथ्वीतलावरच्या, चराचरातल्या प्रत्येक सजीव-निर्जीव घटकाची दखल घेणारा आणि त्याची जपणूक करणारा असेल अशी आशा वाटते. सगळ्या नाही तरी काही सुबुद्ध नागरिकांकडून आपण ही अपेक्षा नक्कीच व्यक्त करू शकतो. म्हणूनच येणारं वर्ष या दृष्टीनं आशेचा एक किरण देऊन जाईल ही सकारात्मक भावना सुखावून जाते. गेली दोन वर्षं अर्थव्यवस्थेची अवस्था चिंतेत भर टाकणारी असली तरी आता देश या गर्तेतून बाहेर येत आहे. पर्यटनाला वाढती चालना, रियल इस्टेट क्षेत्रातला बहर, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना वाढती मागणी, देशात वाहतूक सुकर होईल या हेतूनं कार्यपथावर असणारी रस्ते आणि महामार्ग बांधणीची कामं, पर्यावरणाला नख लावणाऱ्या इंधनाला पर्याय ठरणाऱ्या नव्या पर्यायी इंधनांची चाचपणी, त्यानुसार वाहनांच्या निर्मितीमध्ये बघायला मिळणारे सकारात्मक बदल हे विषय देशाला एका नव्या दिशेकडे घेऊन जात आहेत. म्हणूनच ही सकारात्मकता भविष्याचं कुतूहल वाढवून जाते.

सरलेल्या दोन वर्षांनी आपल्याला जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या उणिवा, कच्चे दुवे आणि आवश्यक असणारे बदल ठळकपणे दाखवून दिले आहेत. हे बदल समाजव्यवस्थेपासून कुटुंबव्यवस्थेपर्यंतच्या प्रत्येक घटकाने अनुसरावेत असेच आहेत. हे अनुसरण आता अधिक नेमकेपणाने होण्याची गरज आहे. म्हणूनच आता समाज सार्वजनिक स्वच्छतेच्या पुढे जाऊन आणखी चार पावलं टाकेल आणि कुटुंबातले सदस्य घरकामात महिलांना हातभार लावण्याप्रती थोडी अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी आशा करायला हरकत नाही. शेवटी कोणत्याही कारणानं का होईना, चांगली सुरुवात होणं गरजेचं असतं. कोरोनासारख्या आपत्तीनं का होईना, आता ती सुरुवात झाली आहे. गरज आहे तो या सकारात्मक बदलाचा वेग कायम राखण्याची. नववर्षात सर्वांना ही प्रेरणा मिळावी एवढीच अपेक्षा…

अलीकडे समाजानं दीर्घकाळ कमालीचा ताण अनुभवला. अजूनही हा ताण पूर्णपणे निवळलेला नाही. असं असताना सकारात्मकता कुठून आणायची हा अनेकांचा प्रश्न असेल. मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण गतकाळातच डोकावणं गरजेचं आहे. कारण ताणतणाव ही नेहमीच नाण्याची अविभाज्य बाजू राहिली आहे. अगदी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारी अनेक कुटुंबं या समाजाने पाहिली आहेत. अठरा विश्व दारिद्र्य आणि सर्व प्रकारची प्रतिकूलता हेच काहींचं प्राक्तन असतं. नियतीनं नेमलेल्या संघर्षाचा सामना करण्यातच काहींची हयात खर्ची पडते. पण तरीदेखील त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत नाही. कारण त्यांची जीवनेच्छा प्रबळ असते.

आजचा दिवस उदास, दु:खी, कठीण आणि अडचणीत गेला तरी उद्याचा दिवस चांगला असेल या आशेवर ते जगत राहतात. भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करत राहतात. अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असते म्हणूनच त्यातल्या काहीजणांची स्वप्नं प्रत्यक्षात उतरु शकतात. प्रतिकूलतेचं आक्रमण तीव्र असूनही त्याविरुद्ध लढण्याची उमेद त्यांना दहा हत्तींचं बळ प्रदान करते. प्रामाणिकता, परिश्रम, हुशारी, समयसूचकता या बळावर ते राखेतून उठतात आणि उत्तुंग झेप घेतात. म्हणूनच निराशेनं झाकोळून गेलो असताना आपण अशा व्यक्तिमत्त्वांकडे, त्यांच्या प्रवासाकडे पाहायला हवं. अडचणी आहेत पण अडचणींवर तोडगेही आहेत याची जाण ठेवायला हवी. हा विचारही आपल्यातल्या निराशेवर फुंकर घालणारा ठरेल. गर्तेतून बाहेर काढणारा ठरेल. म्हणूनच अशा सकारात्मक विचारांचे हार गुंफू या आणि तो येणाऱ्या काळाला अर्पण करून सर्व काही शुभ घडण्याची कामना व्यक्त करू या. कारण आता उष:काल फार दूर नाही…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -