अभिनेत्री ऊर्मिला कोठारे १२ वर्षांनंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. वैदेही असे तिच्या पात्राचे नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
स्टार प्रवाहवर ‘खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुने नाते आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचे वातावरण असते. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रूपात पाहिले आहे.
मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पाहते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखील सामील होणार आहे. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे, असे ऊर्मिला कोठारे यांनी म्हटले.