सोलापूर , आजोती व तिसंगी या दोन गावांत होणारे अल्पवयीन मुलींचे विवाह तालुका आणि ग्रामीण पोलिसांनी रोखले आहेत. कण्हेरगाव (ता. माढा) येथील एका १३ वर्षीय मुलीचा आजोती येथील युवकाशी तर अकलूज (ता. माळशिरस) येथील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह मस्के वस्ती, तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, अंमलदार परशुराम शिंदे यांनी आजोती येथे जाऊन बालविवाह थांबवला. मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. त्या मुलीस सोलापूर येथील महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले. तसेच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक केदार यांनी तिसंगी येथे जाऊन होणारा बालविवाह रोखला. यातील मुलीलाही महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले.