मुंबई : मन झालं बाजींद या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि कृष्णाला शॉक लागून ती शुद्ध हरपते. राया तिला हॉस्पिटलला घेऊन जातो पण रायाला डॉक्टर सांगतात, कृष्णा वाचण्याची शक्यता कमी आहे. रायाला हे ऐकून धक्का बसतो. राया कृष्णाला वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न सुरू करतो. कृष्णाचा जीव वाचतो पण शरीराला जबरदस्त शॉक बसल्याने तिचा उजवा हात निकामी होतो. उजव्या हाताच्या संवेदनाच निघून जातात. त्यामुळे कृष्णाला सीएची परीक्षा देता येणार नाही असा पेच निर्माण होतो.
पण राया कृष्णाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो. या सर्व घटनांनंतर कृष्णा आणि राया यांचा लग्नानंतरचा पहिला मकरसंक्रातीचा सण येणार आहे. कृष्णच्या हाताला संवेदना नसल्यामुळे कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा पूर्ण होणार का? कृष्णाला हळदीकुकूं समारंभात भाग घेता येणार का? कृष्णासमोरच्या या आव्हानाला ती कशी सामोरी जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.