मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनकडून ३० प्रकारच्या फटाक्यांची चाचणी गुरुवारी आरसीएफ मैदान येथे घेण्यात आली. यात १५ प्रकारचे नियमित फटाके तर १५ प्रकारचे ग्रीन फटाक्यांचा समावेश होता. यावेळी देखील आवाजाची पातळी कमी असल्याचे नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे मुंबईतील फटाके वाजवण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनकडून फटाक्यांची आवाजाची पातळी तपासली जाते. २०१० या वर्षी १३०.६ डेसिबल एवढी उच्च पातळी फटाक्यांच्या आवाजाने ओलांडली असल्याची नोंद करण्याता आली. ही नोंद जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे १२५ डेसिबलहून अधिक होती.
मात्र नंतर फटाक्यांच्या आवाजाची पातळी कमी नोंद केली गेली असल्याचे सांगण्यात आले. २०२० पासून तर सरकारने ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली. हे ग्रीन फटाके निरी संस्थेने विकसित केले असून आवाज आणि हवेतील प्रदूषण कमी करणारी आहेत. त्यावर तशी माहिती असते. अद्याप सरकारकडून कोणतीही घोषणा केली नसली तरीही ग्रीन फटाक्यांसह सर्व प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध आहेत.
दरम्यान कोरोना निर्बंधात शिथिलता आणल्यामुळे दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेऊन आहे. तसेच फटाक्यांच्या विक्रीबाबत नवे निर्देशही जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वर्तविण्यात येत आहे.