नवी दिल्ली : कॉल ड्रॉप्स आणि स्लो इंटरनेट सेवेची समस्या गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सतावू लागल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रार करुनही टेलिकॉम सुविधांमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने आता टेलिकॉम विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. टेलिकॉम विभागाने ट्रायला या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्यास सांगितले आहे. तसेच मोबाईल ऑपरेटर्सने त्यांच्या सुविधा सुधाराव्यात यासाठी आदेशही देण्यात आले आहेत.
टेलिकॉम सुविधांमध्ये वारंवार सांगूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. नेटवर्कची खराब क्वालिटी, कॉल ड्रॉप अशा समस्यांबद्दल अनेकदा ग्राहक तक्रार करत आहेत. अशा सुविधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणे हे काम ट्रायचे आहे. सरकारने हा ग्राहकांच्या चिंतेचा महत्त्वाचा विषय असल्याने या प्रकरणी सल्लागाराची भूमिका घेत लक्ष घातले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ट्राय सोबत आता चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता नेटवर्कची क्वालिटी सुधारेल आणि ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल, अशी आशा आहे.