मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणूक भाजप व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे हक्काचे मतदार असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी न्यायालयात जाणार असून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहोत. मागील काळातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळी त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. रमेश कदम आणि छगन भुजबळ यांनाही अशा प्रकारची परवानगी मिळाली होती. प्रयत्न करणे आमच्या हातामध्ये आहे, तो आम्ही कसोशीने करण्याचा प्रयत्न करू.
भाजपचे दोन उमेदवार, महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे ५ उमेदवार निवडून येणार आहेत. आता सहाव्या जागेचे चित्र ३ तारखेला स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.