नागपूर : शेतकरी आत्महत्या हे आजचे सर्वात मोठे विदारक चित्र आहे. ते बदलणे आवश्यक आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समजावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. काटोल येथील अरविंद सहकारी बँकेच्या आवारात दिवंगत अरविंदबाबू देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काटोल नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला १५ हजाराचे धनादेश नाना पाटेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी नाना पाटेकर भावुक झाले. ते म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला धनादेश देण्याची वेळच येता कामा नये. याकरिता राजकारण बाजूला ठेऊन हा विषय हाताळावा लागेल. अनेकदा कानी पडते की, महाराष्ट्र देशात अव्वल आहे. माझ्या मते जेव्हा शेतकरी बळकट होईल तेव्हा आणि तेव्हाच महाराष्ट्र राज्यात पहिला होईल.