पुणे : सध्या राज्यातील 488 आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यात मराठी शाळांमध्ये पुढील वर्षापासून पहिलीच्या वर्गासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बालभारतीच्या संचालकांना दिल्या आहेत. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा, दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणाने समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा, यासाठी पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक, जागतिक दर्जाची असावी, अशा सूचना वर्षा गायकवाड यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.