मुंबई : राज्यातील एसटी संप हा मुंबईतील गिरणी संपाप्रमाणे अयशस्वी करण्यासाठी तो चिघळवला जात आहे. हा संप फसल्यानंतर एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागांवरील जमिनी मिलच्या जागांप्रमाणे विकण्याचा डाव सत्ताधारी शिवसेनेने आखल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
मुंबईतील मिल कामगारांचा संपही अशाच पद्धतीने चिघळवण्यात आला होता. अखेर हा संप अनिर्णीत परिस्थितीत येऊन पोहोचला. त्यानंतर शिवसेनने मिलच्या मालकांसोबत साटलोटं करत जमिनी विकून कोट्यवधींची टक्केवारी गोळा केली होती. आता एसटीचा संपही त्याच मार्गाने जात आहे. हा संप फसल्यानंतर एसटी महामंडळाच्या मालकीच्या विविध शहरातील जमिनींची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सत्ताधारी सरकारने आखल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.