साईबाबा अनेक भक्तांना व्याधिमुक्त करीत असत. एकदा श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांनाही काही कारणाने पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याची परिणती म्हणून त्यांना वरचेवर जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. त्यांनीही पुष्कळ उपचार केले. पण एकही लागू पडला नाही. त्यामुळे ते इतके अशक्त झाले की, त्यांच्या बाबांच्या नित्य दर्शनातही खंड पडू लागला. ही गोष्ट बाबांना समजली तेव्हा बाबांनी त्यांना मशिदीत बोलावून घेतले आणि आपल्या सन्मुख बसवून म्हणाले, आता उलटी केलीत वा शौचाला गेलात तर खबरदार! माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाबांचे हे शब्द बापूसाहेबांना उद्देशून नसून त्यांच्या व्याधींना होते आणि त्या शब्दांचा दरारा तर पाहा! ज्याक्षणी बाबांचा शब्द निघाला त्या क्षणी व्याधींनी पोबारा केला आणि बापूसाहेबांना त्वरित आराम पडला.
एकदा आळंदीचे एक स्वामी बाबांच्या दर्शनासाठी शिरडीत आले. त्यांना कर्करोग होता. त्यामुळे त्यांचा कान इतका ठणकायचा की, त्यांना झोपही यायची नाही आणि त्यांच्या कानाला सूजही येत असे. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना शस्त्रिक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला होता. ते जेव्हा बाबांच्या दर्शनास गेले तेव्हा माधवराव देशपांडे यांनी बाबांना त्यांचा कान बरा करण्याची विनंती केली तेव्हा बाबांनी अल्ला अच्छा करेगा, असे म्हणून काही देशी उपाय सांगितले. स्वामी पुण्याला परतल्यावर साधारणतः आठ दिवसांनी त्यांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते, बाबांच्या आशीर्वादाने ठणका तत्क्षणीच थांबला. थोडीबहुत सूज होती म्हणून मी मुंबईच्या डॉक्टरांकडे गेलो, तर तोपर्यंत सूजही उतरली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नाही, असे सांगितले.
-विलास खानोलकर