नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी२० विश्वचषक स्पर्धेची खरी तयारी इंग्लंड दौऱ्यापासून असल्याचे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेसोबतची मायदेशातील मालिका आणि आयर्लंड दौरा हा केवळ प्रयोग असल्याचे गांगुली म्हणाले. प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली बोलत होते.
गांगुली म्हणाले की, इंग्लंड दौऱ्यासाठी विश्वचषकातील संभाव्य खेळाडूंचाच संघात समावेश करण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडकर्ते इंग्लंड दौऱ्यासाठी संघातील टी२० विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंची निवड करतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या घरच्या मालिकेसाठी निवड, त्यानंतर आयर्लंडचा दौरा हा राहुल द्रविड आणि त्याच्या संघाने डोळ्यासमोर ठेवून प्रयोग केले आहेत. या मालिकेत युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून त्यांना संधी दिली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी के.एल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतींमुळे मालिकेतून बाहेर पडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत कर्णधार आहे. त्याचबरोबर आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या २ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.