मुंबई (वार्ताहर) : आगामी रणजी करंडक स्पर्धेत (Ranji Trophy Tournament) प्रथमच महिला अंपायरिंगच्या भूमिकेत दिसतील. बीसीसीआयने नवीन हंगामासाठी शॉर्ट लिस्ट अंपायरिंग पॅनेल जाहीर केले आहे. त्यात तीन महिलांचा समावेश केला आहे.
१३ डिसेंबरपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदाच्या रणजी स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे स्पर्धेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अंपायरिंग करताना दिसणार आहेत. मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबईची रहिवासी असलेली वृंदा राठी सामन्यादरम्यान स्कोअरर म्हणून काम करायची. एकदा ती न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय पंच कॅथी क्रॉसला भेटली. क्रॉसला भेटल्यानंतर, वृंदाने अंपायरिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला आणि बीसीसीआय अपांयरिंग चाचणी उत्तीर्ण झाली.
चेन्नईच्या जननी नारायणने अंपायर होण्यासाठी नोकरी सोडली. गायत्री वेणुगोपालला क्रिकेटर व्हायचे होते, पण खांद्याच्या दुखापतीने तिचे स्वप्न अधुरे राहीले. तिने क्रिकेटला तिच्यापासून दूर जाऊ दिले नाही आणि अंपायरिंग क्षेत्रात प्रवेश केला.