मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. तसेच अधिवेशनात काय मुद्दे मांडणार हेही त्यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात या सरकारच्या भवितव्याबाबक प्रलंबित असून त्यावर काहीही निकाल लागला नाही. त्यातच अधिवेशन कमी कालावधीचे आहे. आम्ही दहा दिवस अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर विचार करू, असे सांगण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
एकंदरीतच अतिवृष्टी झाली आहे. वैणगंगा नदीला पूर आला असून भंडारा, गोंदीयामधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्याप्रकारे मदत व्हायला हवी होती, ती शेतकऱ्यांना मदत झाली नाही. हे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. अतिवृष्टी ग्रस्तांच्या मागण्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ आण बागायतीसाठी दीड लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.