अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण (hunger strike) सुरू केले होते. हे उपोषण अखेर आज चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आलं आहे. अजित पवार हे उपोषणस्थळी आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. तसंच त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोन करून संवाद साधला.
निलेश लंके यांच्याशी देखील नितीन गडकरी यांनी फोन वरून चर्चा केली. गडकरींकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले.
अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती. यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने मागील चार दिवसांपासून ते उपोषण करत होते. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ठोस शब्द देत नाहीत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.