मुंबई : मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात ऑनलाईन उपहारगृहातील अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपन्यांना महापालिकेच्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून विविध अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे.
मुंबईत ऑनलाईन मागणीद्वारे उपहारगृहातून थेट घरी अन्नपदार्थ पोहचवण्याची सोय आहे. अशा अन्नपदार्थ पोहचविणाऱ्या कंपन्यांना महानगर पालिकेच्या थेट नियंत्रणात आणावे व यासाठी महानगरपालिकेकडून विविध अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. ठरावाच्या सुचनेद्वारे ती मांडली आहे.
दरम्यान मुंबईमध्ये ऑनलाईन कंपन्या ऑनलाईनद्वारे नागरिकांना उपाहारगृहांतील अन्नपदार्थ विहित वेळेत घरपोच पुरवितात. मात्र या कंपन्यांवर महानगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही तर या कंपन्यांचे अन्नपदार्थ पोहचवणारे कर्मचारी वेळेत अन्न पोहचविण्याकरता स्वतःच्या व पादचाऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या दुचाकी रस्त्यांवरून भरधाव नेत असतात. मुंबईतील ठिकठिकाणी उपाहारगृहांच्या बाहेर हे कर्मचारी घोळक्याने उभे असतात. शिवाय त्यांच्या दुचाकी रस्त्यांवर कोठेही वेड्यावाकड्या उभ्या करत असल्याचे देखील आढळून येते. मात्र या सगळ्यांमुळे तेथील ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते, असे देखील म्हात्रे यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे