Tuesday, April 23, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : लोकल प्रवास; मुंबईकरांची सुरक्षा

अग्रलेख : लोकल प्रवास; मुंबईकरांची सुरक्षा

‘दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही ‘… या सुरेश भटांच्या कवितेतील ओळी म्हणजे मुंबईकरांच्या आयुष्याच्या एक भाग झालेल्या आहेत. कर्जत-कसाऱ्यापासून, इकडे पनवेल तर तिकडे विरारपासून प्रवास करत कामाचे ठिकाण गाठायचे हा बहुसंख्य जनतेचा दिनक्रम. दरमहा खिशाला परवडणारा प्रवास तो म्हणजे लोकल रेल्वेचा. त्यामुळे बसायला जागा मिळाला नाही, तर लोंबकळत तास, दीड तास उभे राहून प्रवास करण्याची सवय या महामुंबईतील जनतेला लागली आहे; परंतु हा प्रवास आता जीवघेणा ठरू शकतो का, असा प्रश्न निर्माण झाल्याने, लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी कुठून दगड येईल याचा नेम नाही. त्यात हा हल्ला जीवावर बेतू शकतो, अशी भीती सध्या मुंबईकरांच्या मनाला सतावत आहे. सोमवारी मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ राज्यराणी एक्स्प्रेस मेलवर अज्ञातांनी दगड भिरकावल्याने प्रवास करीत असणाऱ्या महिलेच्या डोळ्यावर लागल्याने त्यांना जबर दुखापत झाली. या घटनेने लोकलच्या प्रवाशांचा विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या आधी शहाड ते मुंब्रा दिव्यापर्यंत रेल्वे रुळानजीक लोकलमधून प्रवास करणाऱ्या बेसावध प्रवासांच्या मोबाइल आणि बॅग चोरणाऱ्या टोळी सक्रिय होत्या. फटका गँग असे त्यांना बोलले जात होते. दरवाजावर उभे राहत असणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठीचा जोरदार प्रहार करीत बॅग, मोबाइल हिसकावून, पाडून पळून जाणे ही त्यांची मोडस ऑपरेंडी होती. या फटका गँगची प्रवाशांना भीती होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांची सततची रेल्वे रुळावर गस्त घालण्याचे धोरण अवलंबिल्याने चोरट्यांचा धोका कमी झाला होता. कळवा येथे मोबाइल चोराशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील या महिलेला जीव गमावला लागला होता. रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोबाइल चोरांशी झटापट करताना मृत्यू होण्याची ही पहिली घटना नसली तरी यामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

ठाण्यापलीकडच्या रेल्वे स्थानकांमध्ये सुरक्षा यंत्रणा सक्षम झाल्या नसल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे मुद्दे सातत्याने उपस्थित होत आहेत. ही बाब रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने ध्यानात घ्यायला हवी. अनेक नागरिक रात्री उशिरा कामावरून घरी परतत असतात. रात्री लोकलमध्ये फारशी गर्दी नसते. त्यामुळे प्रवाशांसोबत लुटीच्या घटनाही होण्याची शक्यता अधिक असते. त्यातच महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. देशभरात मुंबईसह महानगरात महिला रात्री बारा वाजता एकटी घरी पोहोचू शकते, असा लौकिक आहे. मात्र रेल्वे प्रवासादरम्यान इतर प्रवासी असतानाही होणारे चोरीमारीचे प्रकार थांबायला हवेत. प्रवाशांचा रेल्वे प्रवास जास्तीत जास्त कसा सुरक्षित होईल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आजही ही गोष्ट कोणी तेवढ्या गांभीर्याने घेत नाही. एखादी घटना घडल्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत आवश्यक पावले उचलण्याविषयी हालचाली सुरू होतात. मात्र, नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असते. त्यामुळे आजही ‘फटका’ गॅँगचा पूर्णपणे बिमोड करण्यामध्ये रेल्वे पोलिसांना यश आले नाही, हे कालच्या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

मुंबई लोकलमधील एक धक्कादायक प्रकार पश्चिम रेल्वे मार्गावर दीड वर्षांपूर्वी समोर आला होता. माहीम रेल्वे स्थानकादरम्यान मोबाइल चोराचा प्रतिकार करत असताना एक महिला प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडली असून यात सदर महिला गंभीररीत्या जखमी झाली होती. २०१९पासून ते एप्रिल २०२१ या कालवधीमध्ये ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता २०१९मध्ये ९४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यापैकी ५१ टक्के म्हणजेच ४८५ गुह्यांची उकल होऊ शकली. २०२० मधील वर्ष कोरोना काळात गेले. कोरोनामुळे निर्बंध लागू होते. तसेच रेल्वेमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा होती; परंतु असे असूनही या वर्षामध्ये ७८२ गुन्ह्यांची नोंद होत १७३ गुन्हे उघडकीस आले. हे प्रमाण केवळ २२ टक्के आहे. २०२१ मध्ये एप्रिलअखेरपर्यंत २१७ गुन्ह्यांपैकी ६१ गुन्ह्यांची उकल करण्यास रेल्वे पोलीस यशस्वी झाले आहेत.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ७५ लाखांपेक्षा संख्या मोठी आहे. एरवी रेल्वे गाड्या या प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. सकाळ, संध्याकाळी त्यामध्ये पाय ठेवायला देखील जागा नसते. रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी असते. त्याचबरोबर मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. मात्र, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बोलायचे झाल्यास प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. रेल्वे प्रवासादरम्यान कधी काही होईल आणि प्रवाशाचा जीव जाईल, याचा नेम राहिलेला नाही. हे यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरून दिसून येते. आता प्रशासनाने गांभीर्याने पाहायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -